Sunday 23 August 2020

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया. 
बाप्पा.. मला कळायला लागल्यापासून बाप्पा हा माझा जिव्हाळ्याचा विषय ( सगळ्यांचा असेल म्हणा). तर गणपती चे हे दिवस सणापेक्ष जास्ती नवचेतना, उत्साह आणि आनंदाची पेरणी करण्याचे असतात. बाप्पा जसा पहावा लोभस, गोड आणि गोजिराच दिसतो. त्याच्याशी असलेलं नातं अनामिक, न समजावता येणारं तरी मनात खोल रुजलेलं आहे. 

बरं हा आवडायला भाविक, धार्मिक किंवा आस्तिक असायची गरज नाही फक्त निरागसता आणि सौंदर्य बघायची क्षमता असली की भरतोच हा मनात. 

जितके वेळा पाहू प्रेमात पडतो त्याच्या. यंदा मार्च पासून इतकं शांत आणि बिनघोर कधी वाटलंच नाही जितकं आता वाटतंय. याच्या आगमनाची चाहूल लागली आणि निमिशात विश्वास, उत्साह आणि आशा (hope) सचेतन झाली. भीती, अस्थिरता, दुःख, वेदना, कोरोना महावारीने आलेली मरगळ या परिस्थितीत चेतनेची आणि विश्वासाची फुंकर घातली ती बाप्पाच्या आगमनाने आणि दर्शनमात्रे कामना पूर्ती ची प्रचिती अली. 

बाप्पाचं शक्ती, बुद्धी,प्रेम, प्रेरणा, विश्वास, नीती, सखा, सांगाती. 
आणि तोच चेतना. 

टिप: 
मानसिक शांतता जरूर मिळलीये या दोन दिवसात. पण म्हणून विसर्जनाला गर्दी करून हेल्थ वोरीयर्स ची चिंता आणि विघ्न न वाढवण्याची बुध्दी ही यानेच दिलीये आणि म्हणून  विसर्जन घरात कुंडीतच करणार



Monday 13 July 2020

लॉक डाऊन : अनिश्चिततेतील निश्चित क्षण

सकाळ झाली.
माणूस नावाच यंत्र फिरू लागलं.
सरावाचे आवाज गजर, गिझर, मिक्सर, फोडणी, मोबाईलची रिंग,आवरा चा ओरडा, पाण्याची धार, डब्याची झाकण, उकळणार्या चहाचा वास. दूधवाला, पेपरवाला, घंटा गाडी, बाईक, रिक्षा, स्कुल बस, मुलांचा कलकलाट, बसचा हॉर्न, ब्रेक, ट्रेन ची धडधड
दिवस संपला.
माणूस यंत्रातील इंधन जरा कमी झाले.
घर नावाच्या भिंतीत पोचला. परत आवाज बायको, मुलं, आई बाबा, भांडी, कटकट, टीव्ही ची बोंबाबोंब, मोबाईलची रिंग, बातम्यांचा आणि बातमीदारांचा कंठशोश .
अंथरूण नावाच्या चार्जर वर अंग टेकल्यावर हाडांची कडकड.
आणि निरव शांततेत झोपेच्या आधीन व्हायच्या आधी येतो तो सर्वात भयानक आतला आवाज.
का कश्यासाठी असे प्रश्न. पण सारवलेला माणूस.. सरावानेच तो आवाज दाबला जातो. मग झोप, रात्रीच्या गर्भात विरघळून जातो तो. सकाळच्या निश्चित चाकोरीसाठी.
आणि एक दिवस, अचानक त्या देशाचे पंतप्रधान एका अपत्तीशी झुंजण्यासाठी चाकोरीला ब्रेक लावतात. इतका बाका प्रसंग की पूर्ण देश बंद(लॉक डाऊन).
माणूस यंत्र परत पळत सुटतं.
पुन्हा: आवाज टिव्ही चा, फोन चा, रांगा लावा ची ओरड, धान्याच्या ऑर्डर चा आवाज.
आणि मग एक शांतता.
एक दोन आठवडे आरामाचे जातात. मग सधन वर्गात अन्नपूर्णा संचारते. विविध पदार्थ बनतात. आणि हातावर पोट असलेला वर्ग उद्याच्या अन्नाच्या बाबतीत साशंक होऊ लागतो.
आवाज सुरूच असतात. आकडे शेअर मार्केट चे, वाढत्या रुग्णांमचे, लॉक डाऊन च्या उरलेल्या दिवसांचे. माणूस यंत्र गडबडून जातं. भिषण सवयीची नसलेली अनिश्चितता आणि पंढपेशी माणूस यंत्र आतून हलायला लागतं.
यंत्राला भावना दाटून येऊ लागतात. सवयच नसते आपल्या माणसात रमयची घरात बसायची.
खाऊ पिऊ ची मज्जा संपत जाते आणि 50% तरी पगार पुढल्या महिन्यात होईल का अशी भीती वर डोकं काढते.
चिंता, काळजी, निराशा, कंटाळा यात या माणूस यंत्राला जिवंतपणाची जाग येते. गरजांचं प्रमाण व्यस्त असलं तर कमी पैशात आपल्या माणसाच्या उबेत जगता येते असा साक्षात्कार होतो.
रोज रात्री झोपताना सरावाने दाबून टाकलेला तो आवाज ऐकायचं भान येतं. आपल्या आजूबाजूला, सूर्य पक्ष्यांच्या किलबिलाटात उगवतो. पक्षी, पाखरं झाडं सुरेल संगीत गुफतात हे नव्याने लक्षात येते. घर नावाच्या भिंतीना घरपण येऊ लागते. आणि धीर येतो माणूस यंत्राला माणूस म्हणून स्वतःशी संवाद साधायचा.
सुरू होतो एक नवा प्रवास.
अनिश्चीततेने शिकवलेला निश्चित क्षणात जगायचा प्रवास.

Saturday 11 July 2020

लॉक डाऊन डायरीज

खूप प्रेम करून लग्न केलं तिने. लग्न ठरलं, ते दोघे भेटत राहिले रुसवे फुगवे ते मनवण यातला रोमान्स कधी त्याला उकललाच नाही. कळली ती चिडचिड! त्याच ठरलेलं होत हे योग्य ते अयोग्य. तिच्यापेक्षा खूपसा वेगळा रोमान्सशी  फारसा संबंध नसलेला ' तो ' तिला आवडला. फार क्लिअर वाटायचा तो तिला. 

तिला बोलायला खूप आवडायचं त्याला अवडीचंच बोललेलं आवडायचं. ती वाहत होती तिच्या मनातल्या त्याच्या प्रतिमेत तो अलिप्त होता बहुतेक. 

ती स्वतःला स्मार्ट म्हणायची, समाजाच्या योग्य आयोग्यतेची गणित तिला फार जमायची. कुठे हसायचं, कुठे हटकायच, कुठे भांडायचे अन कुठे एक पाऊल पुढे तर कधी एक पाऊल मागे टाकायचं हे तिला बरोबबर उमगायच. नाती त्यामुळे फुलतात हा तिचा अनुभव होता.

ते दोघे भेटत राहिले. ती स्वप्नात आणि तो भविष्यात जगायचा. त्याचे ते प्लॅन्स ऐकून ती भारावून जायची. तारुण्याची उमेदीची वर्ष त्यांनी एकत्र घालविली, म्हणजे लग्न संस्कार? की सोहळा? काय तो करून एका पवित्र बंधनात दोघे  एकत्र आले की बांधले गेले समाजाच्या चौकटीत? 

ते काही असो, तर ती दोघे लग्न करून एक सुखद संसाराची स्वप्ने पहात एकत्र नंदू लागली. ती रुळत होती, शिकत होती सासू सासरे, दीर, नणंदा अशी नवी नाती स्वीकारायला,  या नंतर आपसूक येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलायला. ती खुलत होती,  शोधत होती तिच्या मनातल्या प्रतिमेत त्याला...

काही दिवस, महिनेही नाही गेले आणि तणावाने आधी बेडरूम मग घर आणि मग मनं ओतप्रोत भरली. आधी लग्नास योग्य असलेली ती त्याला असमंजस, त्याला त्रास द्यायला लग्न करून आलेली खलनायक वाटायला लागली. तिची कथा काही निराळी नव्हती तिलाही तो रुक्ष आणि स्वमग्न वाटायला लागला. त्यात भर म्हणजे सासर आपलं मानून सगळं करत असूनही बेजबाबदार पणाचं लेबल तिच्या माथी चिकटलच.

हळू हळू बोलण्याची भांडण झाली. अबोला नव्हता पण एक घुसमट होती. नात्यात एक दुरावा पसरत होता. वाद नको म्हणून सो कॉल्ड सोडून दिलेल्या गोष्टी मनात साचत रहायच्या.  एकमेकांना सोडायची हिम्मत नव्हती किंवा नात फरफटत न्यायची सवय झालेली काही असेल पण ते एकत्र राहिले.

 आजारपणात साथ, गरजेला हात मिळत होता पण मनं मात्र कोरडीच होती कित्येक वर्ष्यापासून. भांडून चिडून कंटाळून काही विषय कायमचे बंद झाले ते मॅच्युरिटी च्या गोड लेबल खाली  मिरवले. वरवर प्रगल्भ वाटणार नातं आतून पोकळ आहे, हे फक्त त्याच दोघांना माहीत होते आणि त्या दिखाव्याच्या आत सोसलेले एकटेपण आज त्यांना सलत होतं.
मोकळं व्हायचं होत त्यांना. २ वर्ष्यापासून प्रयत्न करत होते वेगळं होण्याचा पण पंढपेशी मन धजत नव्हते.  गुंता फार वाढत होता.

अशात मग सक्तीची बंदी आली. मुलगा घरी येऊ शकत नव्हता आणि हे कुठे जाऊ शकत नव्हते. कित्येक वर्ष  एकमेकांच्या नसण्याची सवय असलेल्या या दोघांना 2 आठवड्यानंतर एकमेकांशी बोलावेच लागले आणि आश्चर्य म्हणजे या समांतर जगणाऱ्या जीवांना एकमेकांशी भांडत भांडत मग बोलताही आले.

5 आठवड्यांनंतर  गुंता सुटला, पण वेगळे न होण्याच्या निर्णयावर. नव्याने ते दोन जीव उतार वयात एकमेकांना भेटले होते. अधिक पोक्त अधिक विचारी बनून.

 6 व्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला 33 वर्षे पूर्ण होतील.

म्हणजे त्याचा anniversary cake खयला काही मला जाता येणार नाही पण निदान लॉक डाऊन संपल्यावर यांच्या बरोबर कोर्टात मात्र जावे लागणार नाही हे निश्चित.

लॉक डाऊन चा positive effect 

टीप: हे माझे नातलग लागत नाहीत त्यामुळे कोण ग असे पर्सनल वर विचारू नका. फक्त खूप नकारात्मक वातावरणात एक पोसिटीव्ह गोष्ट अनुभवली ती लिहावीशी वाटली म्हणून हा लेख प्रपंच

.... रेश्मा आपटे