Wednesday 26 April 2017

नातं

उधाणलेला समुद्र अथांग पसरलेला, एकटाच तो किती वेळ मरीन ड्राइव्ह च्या कट्ट्यावर बसलेला. म्हणजे कट्टा तसा गजबजलेला नेहमी सारखा उत्सहाने फुललेला, प्रेमी युगुलांच्या प्रेमाने मोहरलेला, तुटलेल्या हृदयासाठी हळहळणारा,मैत्रीच्या आनंदात हसणारा, म्हाताऱ्याच्या डोळ्यात रडणारा. सगळ्याच भावना धीरगंभीरपणे स्वतःत सामावणारा. पण तो मात्र एकटाच आज तो उसळणार्या लाटांबरोबर फुलत नव्हता, फुटणाऱ्या लाटेत खळाळून हसत नव्हता. मावळतीच्या सूर्यबिंबाकडे टक लावून बघत, मी सूर्यालाही डोळ्यात सामावू शकतो असंही म्हणत नव्हता. खूप खूप बोलणारा स्वतः बरोबर तिलाही खुलवणारा तो काहीच बोलत नव्हता. जणू आज  मावळतीकडे झुकलेल लाल सूर्यबिंब त्याला सांगत होत " प्रकाशाला डोळ्यात साठवण माणसाच्या हातात नाही " 

समुद्र खवळलेला तस त्याच मनही! बेसूर शांततेचा भंग करत त्याच्या हातावर हात ठेवत शेवटी ती बोलली, "काहीच नाही का बोलणारेस?" तिच्या मऊ हातांच्या स्पर्शाने तो विजेचा झटका बसावा तसा भानावर आला. त्याच्या डोळ्यांत साठलेला समुद्र लपवत एक खोटं हसू ओठांवर चिकटवून म्हणाला, "बोल ना?".

ती : "तू बोल, नेहमीसारखं उत्साहाने भरलेलं ! जिवंत.  मला खूप मोकळं वाटतंय अरे, ह्या आधी वाटलं नव्हतं तेव्हढ. तुला आज  सुचत नाहीये एखादी कविता, चारोळी? ." तो काहीच बोलू शकला नाही फक्त तिच्याकडे पाहत बसला. फक्त "सॉरी" इतकच बोलला. तशी ती रागावली "स्वतः वर प्रेम करायला शिकवलंस म्हणून sorry ? मलाही भावना आहेत याची जाणीव करून दिलीस म्हणून sorry ? "ती बोलत राहिली ...
तो : " नाही ग माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातलं प्रेम हरवलं म्हणून."
तिने त्याला विचारलं "प्रेम म्हणजे काय रे?" तिच्या प्रत्येक problem  च solution असणारा, तिचा जीन आज नि:शब्द होता. काही सेकंदांच्या शांतते नंतर ती म्हणाली ह्या फुटणाऱ्या लाटा खूप काही सांगतात त्यांचे तुषार किती हवे हवेसे वाटतात. तुषार ह्या नावाने काही क्षण हळवी झाली. डोळ्यातून मुक्त वाहिली. त्याला खात्री पटत चालली होती की, आपण ह्या निरागस मुलीला खूप अस्वस्थ, एकटं करून टाकलाय. तिचा हात धरून आयुष्य काढायची कधीच स्वप्न पहिली नाही, तिलाही दाखवली नाही. कोणाचा हात धरून जगण्यापेक्षा स्वतः च्या पायावर उभं राहून त्याच्या साथीने जग असाच सांगत होतो. पण या नादात तिच्या प्रेमापासून तुषार पासून वेगळं करण्याचं पातक त्याला सहन होत नव्हतं.  तेव्हढ्यात ती त्याचा हात पकडून म्हणाली "श्रद्धांजली वाहूयात?" तो खुळ्यासारखं बघात राहिला तिच्याकडे काहीच अर्थबोध न झाल्यासारखा. अस्पष्ट पुटपुटला,"श्रद्धांजली? कोणाला? "  तिने त्याला डोळे बंद करायला लावले आणि २ मिनिट नि:शब्द गेली मग जसे त्याने डोळे बंद केले तसे तिच्या सांगण्यावरून ते उघडले यंत्रवत.

कॉफी? हसत तिने त्याला विचारलं? तसा मात्र तो उसळला तिचा हात पकडत त्याने तिला विचारलं, " काय चाललय तुझं?  तू वेडी झालीयेस का?  कोणाला श्रद्धांजली? भडाभडा बोल तुझ्या अगम्य असण्याचा त्रास होतो मला, आज गूढ वागणं नाही झेपते मला तुझं. आपण तुषार शी बोलूया का? त्याला आपलं नातं उमगलं नाहीये समजावूया त्याला मी बोलतो हवं तर , अग .. "
 त्याला तोडत  ती उठली नेहमीच मधाळ हसून म्हटली "तू तर माणूस झालास रे असहाय्य माणूस .. तुझ्या भाषेत सांगायचं तर ' डोक्यात मणभर negativity घेऊन त्या लाटे सारखा तुझ्या self  pity  चा फुगा फुगलंय need to empty your mind, detox it ".

तो:" तू काहीही बोलून मला guilt देऊच शकत नाहीस कारण मुळात मी काही चूक केलेलच नाहीये. मी तुला खोटी स्वप्न कधीच दाखवली नव्हती, मी तुला तुझ्या तुषार पासून कधीच तोडलं नाहीये. 

ती हसायला लागली खळखळून तुला guilt  नको म्हणून चुकीचं असतानाही तू माझं आणि तुषार च नातं साधायचा प्रयत्न करणार? जिथून आणलास तिथेच नेऊन सोडणार?  का  भीती वाटते  commitment  मागेन तुझ्याकडे  याची ? "

तो: नाही ग अस नाही. पण तू एकटी ..
ती: एकटी ?  अरे राजा तू मला जगायला शिकवलयस  you actually made me revisit myself and i am not going to leave it because " love myself". तू विचारायचास ना स्वतःवर प्रेम नसेल तर दुसऱ्याला काय प्रेम देणार?  एक वर्षांपूर्वी तू मला असे खूप प्रश्न विचारलेस. तेव्हा भंडावून गेले मी. तुला भेटूच नाही अस वाटायचं. माझ्या शांत आयुष्यात तू वादळ निर्माण करत होतास. पण व्यसन लागल्यासारखे भेटत गेलो आपण एकमेकांना. तुझ्याबरोबर घालवलेली काही मिनिट पण मला ऊर्जा देऊन जायची! जगण्याची ऊर्जा!. तुला आठवत एकदा तू मला तुझी एक कविता वाचून दाखवलीस आणि विचारलंस कशी आहे? मी म्हटलं 'अगम्य' तेव्हा हसून म्हणालेलास आज पहिल्यांदा मनापासून  बोललीस.  मी त्या अगम्य ओळीच्या प्रेमात पडले. मी तुषार शी बोलेन हे सांगायच्या आधी मी तुला विचारलेलं आपण एकमेकांचे कोण आहोत? तू म्हटलं "काही नात्यांना नावं  नसतात, ना ती समजावता येतात ती फक्त समजून घ्यायची असतात. मैत्री, प्रेम यात अडकणार नातं नाहीये आपलं", आणि  आणि मगाशी म्हणालास तुषार ला समजावूयात आपलं नातं! तुला तरी समजलंय का रे ते? मगाशी आपण जी श्रद्धांजली वाहिली ती माझ्या चुकीच्या व्यक्तिमत्वाला जे कस कोण जाणे कधी कोण जाणे पण मला घट्ट चिकटलं. तू भेटल्यावर पुन्हा एकदा मी नव्याने विचार करायला शिकले. जिवंत असणं आणि प्रेम करतो त्या माणसाबरोबर फरफटणं हे आयुष्य नाही, तर माझं जगणं  म्हणजे माझं मन, माझ्या भावना, स्वाभिमान, आवडी हे सगळं आहे याची मला नव्याने जाणीव झाली. मी माझ्यासाठी हसायला शिकले आणि भोवतालचं जग जणू काही खुलत गेलं. आनंदात जगणं  मग फारच सोपं वाटू लागलं. माझ्या शब्दाला काय भावनांनाही किंमत नाही पासून ते मी नोकरी करून स्वतःला आणि माझ्या मुलीला एकटी पोसू शकते पर्यंत निर्णय घेणं हा प्रवास मी फक्त एका वर्षात पार केला.

तुषारचा हात सोडताना माझा हात थरथरला नाही आणि म्हणूनच तो माझा हात झटकू शकला नाही.
मी माझ्या team leader ने दिलेली ऑफर संधी म्हणून स्विकारलीये. मी ४ महिन्यांसाठी चीन ला चाललेय. अर्थातच चिनू ला घेऊन हेच सांगायला आलेले आज.

मला माहितेय आपण फोन नंबर किंवा मेल एक्सचेंज करणार नाही कधीच हे आपलं ठरलाय. जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा वाटलं कशी जागें तुला भेटल्या शिवाय मग जाणवलं की, तू माझ्याबरोबर असशील कायम तू दिलेल्या  confidence  मधून!

 कॉफी मात्र आजही राहिली पण जर मी आल्यावर परत भेटलोच तर तेव्हा माझ्या success  ची कॉफी नक्की घेऊ. मनात guilt  ठेऊ नकोस. तू मला स्वप्न दाखवलीस पण चुकीची नाही. तुझ्या शब्दात सांगते बघ समजतंय का ? " मन, विचार आणि डोकं स्वच्छ असल की नातं निरागस आणि निर्मळ रहातं त्याच ओझं होत नाही. तिचे श्वास गालाला लागेपर्यंत ती जवळ अली आणि कुजबुजली "take care my dear motivational speaker"

सूर्य मावळला होता. ती निघून गेली तो तिच्याकडे पाहत बसला.
कदाचित त्यांचं नातं तिला उमगलं होत आणि तो मात्र  खूप बुकं वाचून कोरडा होता.